Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

मगर... अश्रू

$
0
0

बातमी कळली आणि तिला ओळखणाऱ्या साऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या अश्रूंमध्ये आपुलकीचा भाव होता, विरहाची डूब, भावूकतेची जाणीव होती. पदरच लागले डोळ्यांना... कशी बरी होती, येत होती रोज बिचारी. आली नि खाऊ घातलं की खात होती आवडीनं. कशाची तक्रार नाही की काही नाही. माणसानं असं साधं असायला हवं. आहे त्यात संतुष्ट राहण्याचं मूर्तिमंत उदाहरण होती ती. गेले कित्येक दशकं ती याबाबत प्रेरणा देत होती. आता नाही तर तिची उणीव भासत आहे, अशाच काहीशा भावना उमटल्या, ती गेली तेव्हा!

ती तशी प्राणी. पण, तिचं ते अजिबात सुंदर-सुबक नसलेलं रूप पाहून माणूस तसाच हबकतो. तिनं जबडा उघडला की हादरतो. पाऊसपाण्याच्या दिवसांत ती चुकून रस्त्यावर आली काही गावांत किती गहजब उडाला होता. जीव म्हणू नका थाऱ्यावर, थयथयाट नुसता तिला पकडेपर्यंत. तेव्हा दोन हात दूरच बरे, असं मनुष्यास वाटत असतं. मनुष्यास हे जे वाटणं आहे, त्याला काही अपवाद आहेत. हाही गुणधर्म. तर, तशा त्या प्रत्येक गोष्टीपैकी हा प्राणी हीही एक अपवादात्मक गोष्ट समजावी आणि हा अपवाद गोड मानून घ्यावा.

आपल्या प्राणिधर्मातील गुणधर्म तिनं बाजूला ठेवला होता. माणसांप्रतीचा तिचा हा लळा. तिचा स्वभावधर्म हा मांसाहाराचा. पण सहवासात तिनं तो बाजूला ठेवल्याचं मोठ्या आत्मीयतेनं सांगितलं जात होतं. ती होती मगर, पण होती शाकाहारी. शाकाहार तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग झाला होता. पंचक्रोशीला त्याचं कोण अप्रूप होतं. तिनंही मोठ्या आवडीनं ही जीवनपद्धत स्वीकारली होती. ना कुणाच्या अध्यात, ना मध्यात. आपण बरं, आपलं पाणी बरं आणि आपला आहार बरा. नित्यनेमानं तो मिळतोय, यातच सर्व आलं. देवाची कृपा!

‘बबिया’ नाव होतं तिचं. ती रोज वर यायची. रोज दर्शन द्यायची. ती दिसली की भाविकांना हायसं वाटत असे. हायसे म्हणण्यापेक्षा छान वाटत असे. ती न दिसली की चुकचुकल्यासारखं होत असे. इतकी तिची सवय होऊन गेली. माणसांना तिची, तिलाही माणसांची सवय झालेली. प्राण्यांना माणसांची सवय होणं आणि माणसांना प्राण्यांची सवय होणं आणि माणूस हाही एक प्राणी असणं, या तिन्ही वाक्यांत एकात्मता असली, तरी या तिन्ही स्वतंत्र वृत्ती आणि प्रवृत्ती आहेत, याची जाणीव ठेवायला हवी. ही जाणीव ठेवण्याचं काम माणूस फारसा करत नाही. याचं भान निसर्गालाच ठेवावं लागतं. त्यानंही कशाकशाचं भान ठेवावं? असो. विषय भावनिक आहे. आपण भावनिकता सोडू नये. ती गेली तेव्हा कित्येक डोळ्यांत अश्रू तरळले होते. हे अश्रू मगरीचे नव्हते, मगरीसाठीचे होते, हे नीट लक्षात घ्यावं. सध्या दिवस संभ्रमाचे आहेत. नावांच्या गोंधळाची ‘चिन्हे’ आहेत. तेव्हा त्या मगरीसाठी तरळलेले भावनावेगाचे अश्रू आणि मगरीच्या डोळ्यांतले पारंपरिक अश्रू यातला भेद लक्षात घ्यावा, हे भरल्या डोळ्यांनी भावनिक आवाहन आहे.

- चकोर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>