Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

माणसामुळे बदलते सृष्टी..!

$
0
0

नैसर्गिक निवडीतून सृष्टीत बदल झाले असे डार्विनने सांगितले. तर 'इव्हॉल्विंग अवरसेल्वज'चे लेखक जुआन एनरिक्वेझ आणि स्टीव गुलान्स म्हणतात, की निसर्गाने नव्हे तर माणसाने केलेल्या उद्योगामुळे सृष्टी बदलते आहे. प्राण्याच्या डीएनएमध्ये एकेकाळी निरुद्देश बदल घडत असत, आता माणूस ठरवून, काही उद्देश ठेवून बदल घडवत आहे. माणसामुळे सृष्टीवरील प्राणी आणि वनस्पती जीवन बदलत आहे.

जीवसृष्टीचा विकासक्रम नैसर्गिक निवड पद्धतीने झाला असे डार्विन म्हणतो. प्रजातींना निसर्गातल्या प्रतिकूल प्रेरणांशी, दबावांशी लढून जिवंत रहावे लागले. ज्या प्रजातींनी बदल केले त्या टिकल्या, ज्यांना बदल करणे जमले नाही त्या नष्ट झाल्या. उंचावरची पाने खाण्यासाठी ज्यांनी मानेची लांबी वाढवली ते जिराफ टिकले. खोल फुलांमधले केसर खाण्यासाठी ज्यांना मेहनत करून चोचीची लांबी वाढवणे जमले ते पक्षी त्या परिसरात टिकले. ही करामत ज्यांना जमली नाही ते प्राणी आणि पक्षी नष्ट झाले. डार्विनचाच समकालीन मेंडेल याने मटाराच्या बियांचे संकर करून नवी बियाणे तयार केली. तो माणसाचा निसर्गामध्ये केलेला हस्तक्षेप होता, निसर्गाने केलेला बदल नव्हता. मेंडेलच्या प्रयोगामधे आधुनिक जेनेटिक्स दडलेले होते.

यथावकाश वॅटसन आणि क्रीक यांनी डीएनएचा शोध लावला. माणसाच्या पेशीत डीएनए म्हणजे जीन्सची जुळणी असते. प्रत्येक जीन एक ठराविक रसायन, प्रोटिन तयार करते. प्रत्येक जीनचा उद्योग दुसऱ्या एखाद्या किंवा अनेक जीन्सच्या कामावर अवलंबून. जीन्सनी केलेल्या उद्योगातून प्राण्याचे असणे, जगणे, दिसणे, वैशिष्ट्ये, विचार करणे इत्यादी इत्यादी गोष्टी सिद्ध होतात. डीएनएमध्ये सारे लिहून ठेवलेले असते हे वॅटसन-क्रीक यांच्या सिद्धांतानंतर विकसित झालेल्या जेनेटिक्समुळे प्रकाशात आले.

वॅटसन-क्रीक यांचा समकालीन वैज्ञानिक विल्सनने मुंग्यांचा अभ्यास करून वेगळेच सांगितले. त्याचा सिद्धांत असा, माणसाचे जगणे परिस्थिती आणि परिसराशी होणाऱ्या परस्परसंबंधातून ठरते. परिसराचे परिणाम जीन्सवर होतात, त्यातून जीन्स बदलतात, त्यातून प्राणी विकसित होतो. वैज्ञानिकांनी माणसाच्या विविध व्याधी कोणत्या जीन्स बिघडल्यामुळे होतात ते शोधले. बिघडलेला जीन माळेतून तोडून त्या जागी निरोगी जीन गुंफायचं तंत्रज्ञान विकसित केले. कृत्रीम लाल पेशी आणि पांढऱ्या पेशीही तंत्रज्ञ तयार करत आहेत. शरीरात कुठे काय बिघडले त्याचा शोध लावणारे नॅनोबॉट्स माणसाच्या शरीरात सोडण्याची व्यवस्थाही तंत्रज्ञ करत आहेत. माणूस आता २५० वर्षं निरामय जगेल असे वैज्ञानिक म्हणत आहेत.

डार्विन म्हणत होता, की माणसाचं जगणे मरणे निसर्ग ठरवतो. आता माणसाने स्वतःचे मरणे जगणे ठरवलेय. अस्तंगत झालेल्या वनस्पती आणि प्राणी माणूस नव्याने जन्माला घालतोय, पूर्वी कधीही अस्तित्वात नसलेले वनस्पती आणि प्राणीही माणूस तयार करतोय. डार्विनपासून सुरू करून आताच्या जीनचे तुकडे करणाऱ्या कात्रीपर्यंतच्या घटनांचा आणि तंत्रज्ञानांचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. माणसानेच तयार केलेल्या वस्तू व रसायने यांचा माणसावर होणारा दुष्परिणाम लेखकांनी नोंदला आहे. बॅक्टेरिया आणि व्हायरस सृष्टीत किती पसरले आहेत आणि प्रभावी आहेत तेही लेखकांनी मांडले आहे. जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी ही नवी तंत्रे, त्यांचे वापर पुस्तकावरून कळतात.

लेखकांचे दृष्टिकोन वेगळे आहेत. नवे जेनेटिक कोड असलेले प्राणी-वनस्पतींचे समांतर आणि आजच्यासारख्या माणसाचे अशी दोन जगे एकत्रितपणे नांदतील, की एकमेकाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतील असा प्रश्न विचारून एनरिकेझ चिंतित होतात. गुलन्स म्हणतात, माणूस शहाणा आहे, बदलांचा घातक वापर करणार नाही, चांगला उपयोग करेल. पुस्तक वाचकाला विचार करायला लावते. भीती घालते आणि आशा पल्लवीत करते. विकासक्रम, उत्क्रांती हा विषय लेखकांनी अपडेट करून मांडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>