Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

गुंत्याच्या गुंत्याचा गुंता

$
0
0

त्याचं झालं असं, की आमच्या घरी जरा धुसफूस सुरू होती. 'ते असं म्हणालेच कसं,' हे पालुपद होतं. आता ते म्हणजे कोण आणि असं म्हणजे कसं, हा प्रश्न काही आम्हाला सुटेना. तोच पुढचा मुद्दा येऊन आदळला, 'म्हणजे, मला त्यांचा राग नाही आलेला. त्यांच्याविषयी आदरच आहे; पण ते हे जे काही म्हटले ना, ते नाही पटलं.' अरे! पण म्हणजे नक्की काय? बरं हे जे काय चालू आहे, ते नक्की घडलं कधी, हेदेखील आम्हाला समजत नव्हतं. आम्ही तीन कुटुंबं सहलीला गेलो होतो, तेव्हा यातलं काही तरी घडलं असणार, असा अंदाज आम्ही बांधला. आम्ही नुकतेच दुसऱ्या इमारतीत राहायला गेलो आहोत. पूर्वी आम्ही जिथं राहत होतो, तिथल्या शेजाऱ्यांबरोबर सहलीला जायचो. नव्या ठिकाणी दोन नवे शेजारी भेटले. ते एकमेकांबरोबर पूर्वीपासूनच राहत होते. आता आम्ही त्यांना जाऊन मिळालो. या वर्षी आम्ही चक्क दिल्ली गाठली. एकमेकांच्या सहकार्यानं, एकमेकांना समजून घेत आमचं चाललं होतं. आता तीन तीन कुटुंब एकत्र म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच. कोणी तरी काही तरी म्हणणारच. कोणाला तरी ते पटणार नाही आणि कोणाला तरी तेच सर्वोत्तम वाटेल. हे सारं आपण समजूनच घ्यायला हवं.

घरात ही अशी वेगवेगळी वाक्य आदळत असतानाच, शेजारच्या थोरल्यांचा फोन आला. त्यांच्या घरीही तसंच काही घडलं होतं म्हणे! आम्ही दोघांनी या विषयावर सखोल, घनघोर चिंतन केलं. तिसऱ्या शेजाऱ्यांकडून काहीच संदेश न आल्यामुळे, कदाचित त्यांच्याकडूनच काही तरी घडलं असावं, असा अदमास आम्ही बांधला. आम्ही हे चिंतन करतच होतो, तोपर्यंत जुन्या शेजाऱ्यांचा फोन आला. त्यांनी ख्यालीखुशाली विचारली आणि हळूच विषयाला हात घातला... 'सगळं काही ठीक आहे ना? थोडं समजून घेतलं असतं इथं, तर घर बदलावं लागलं नसतं तुम्हाला. तुम्हाला सहावा मजलाच हवा होता. आता तिथं आम्ही राहत होतो ना... राहतं घर रिकामं करणं कसं शक्य होतं? इथं मिळाला सहावा मजला; पण शेजारी बोललेच तुम्हाला...'

यांच्यापर्यंत या सगळ्या बातम्या कशा पोहोचतात कोण जाणे? आम्ही पुन्हा चिंतन करू लागलो. आता अधिक सखोल चिंतनात बुडालो. तिसरे शेजारी काय म्हणतात, नक्की काय झालंय, हे समजून घ्यायचं होतं आम्हाला; पण त्यांचा काही फोन येईना आणि घरात कोणी काही सांगेना. आम्ही दुग्ध्यात, बुचकळ्यात आणि चिंतेत होतो. त्यात अचानक कानावर आलं, की आम्हा तिघांपैकी कोणी तरी पुढच्या सहलीला एकट्यानंच जाण्याचं बोललं आहे म्हणे.

अखेरीस आम्ही पुन्हा एकदा थोरल्यांशी संपर्क साधला. कोणालाही कुठूनही काहीही कळत नसलं, तरी थोरल्यांना प्रत्येक गोष्टीची बित्तंबातमी असते. आम्ही पुन्हा आमची काळजी, कळकळ, चिंता त्यांच्या कानावर घातली. ते फक्त हसले. म्हणजे फोनवर तसं दिसलं नाही; पण आजकाल फोनवर पलीकडे काही क्षण शांतता असली, की त्यांची प्रतिक्रिया काय असावी, याचा अंदाज आम्हाला येऊ लागला आहे. मग म्हणाले, 'गुंताच आहे हा. राहू द्या तसाच. सुटेल आपोआप.' आम्हीही मग त्यांचं ऐकलं. खरंच काही वेळातच समोर चहाचा कप आला, 'काय झालं ते ऐका...' असं म्हणत कुटुंब घडाघडा बोलतं झालं.

- चकोर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>