Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

पारदर्शक!

$
0
0

>> दिनकर गांगल

सज्जन आणि दुर्जन यांच्या व्याख्या सद्यकाळातील उदाहरणे घेऊन करण्याचा प्रयत्न वाचकांना विचारप्रवर्तक वाटला; तशा प्रतिक्रिया आठवडाभर येत राहिल्या. स्वाभाविकच आहे, सर्व माणसांना सर्वत्र सज्जनतेचा व्यवहार असावा असे वाटते. त्यांना अनुभव मात्र उलटा भासतो. वास्तवात तसा तो नसतो, परंतु जगाचे जे चित्र सर्वसामान्य माणसासमोर, मुख्यत: मिडियातून उभे केले जाते, त्यामधून जग दुष्ट, बकाल प्रवृत्तींनी ग्रासले आहे असा समज होतो. माणूस सुष्ट किंवा दुष्ट असतो, याचे कारण तो प्राप्त परिस्थितीला शरण जातो, ती परिस्थिती उलटवण्याचे, बदलण्याचेदेखील सामर्थ्य त्याच्याकडे आहे याची जाणीव त्यालाच नसते!

संपादक-लेखक-कवी अरुण शेवते याने सज्जनतेचे दोन प्रकार सांगितले. तो म्हणाला, की काही व्यक्ती भूमिका न घेता सज्जन राहतात. तसे राहणे सोपे असते. त्याने वि. वा. शिरवाडकर यांचे नाव तशा सज्जनाचे म्हणून सांगितले. मात्र, त्याला जीवनात काही भूमिका घेऊन व्यवहार सज्जनतेने केलेल्या व्यक्तीचे नाव सुचेना. प्रकाशक-लेखक रामदास भटकळ यांनी राम पटवर्धन यांच्या स्मृतिसभेत त्याच धर्तीचे मत महिन्यापूर्वी व्यक्त केले होते. ते म्हणाले, की शिरवाडकर, करंदीकर, पेंडसे यांनी त्यांची भूमिका कधी आग्रहपूर्वक सांगितली नाही. त्यांच्या वाङ्मयाच्या आधारे त्यांचा कौल जाणायचा! त्यामुळे साहित्य-संस्कृती जगात केव्हातरी दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे तडफेने बंड पुकारून पुढे आलेले दिसतात, पण ते तेवढेच. स्वत: भटकळ यांनी 'ग्रुप ७७' या छोट्या समुदायातून इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या विरोधात प्रतिकार उभा करण्याचा प्रयत्न रचला होता. ती त्यांची भूमिकाच ठरली.

व्यक्तीने, विशेषत: लेखक-कलावंताने भूमिका घेणे अपेक्षिले जाऊ लागले ते डावे विचार येथे येऊन पोचले तेव्हा. कार्ल मार्क्सने जग बदलण्याचा सिद्धान्त मांडला, लेनिन यांनी तसा प्रयोग रशियात गेल्या शतकारंभी घडवून आणला. तेथे मार्क्सवादी राजवट आली. भारतीय तत्त्वज्ञानात जसे द्वैताद्वैत पंथोपपंथ झाले तसेच मार्क्सवादातही घडले. रशियाच्या लेनिनची एक तऱ्हा, चीनच्या माओचा दुसरा विचार, इकडे व्हिएतनामच्या हो चि मिन्हचा एक प्रयोग तर तिकडे क्यूबाच्या फिडेल कॅस्ट्रोचा दुसराच प्रयोग. या सर्वांचा मिळून जो विचार, तो भांडवलशाहीविरुद्धचा म्हणून डावा ठरला. त्याने अर्धे जग व्यापले. त्यामधून निर्माण झाले शीतयुद्ध- दोन महासत्ता रशिया व अमेरिका यांच्यात. त्यावर खरेतर, पं. नेहरूंनी पंचशील मांडून शांतता हे मूल्य जगासमोर आणले होते. पण चीनने घात केला. नेहरूंनंतरच्या राजकारण्यांनी नेहरूंचा शांततेचा मंत्र नीट जाणला नाही. जगही विभागले गेले. जीवनविषयक भूमिका म्हणजे तो डावा किंवा उजवा विचार असे सूत्र ठरले.

काळ बदलत असतो पण माणसे तत्त्वे सुधारून घेत नाहीत. रशियाच्या गोर्बाचोव्ह यांनी ते धारिष्ट्य केले. त्यांनी मार्क्सवादी राजवटीचा बंदिस्तपणा नष्ट केला व जनव्यवहार खुला केला. परंतु मार्क्सवादी जे लोक आहेत ते रशिया-चीन यांनी निर्माण केलेल्या चौकटीच्या बाहेर येत नाहीत. व्हिएतनामने अमेरिकेचा पाडाव केला हे खरे, पण नंतर व्हिएतनामी तरुणही गोर्बाचोव्हने खुल्या केलेल्या ग्लोबल वातावरणात अमेरिकेकडे धावत निघाले आहेत!

भूमिका कोणती घ्यायची? कोणत्या तत्त्वांच्या आधारे सज्जनतेचा व्यवहार ठरवायचा? स्वातंत्र्य, समाजवाद, समानता, निधर्मता ही तत्त्वे युरोपातील रेनेसान्समधून पुढे आली, मार्क्सवादाने त्यांना टोक आणले. जगाने ती तत्त्वत: स्वीकारली आहेत. प्रश्न आहे तो आचरणाचा, म्हणजे गव्हर्नन्सचा. त्यामधील पारदर्शकता ही भूमिका असू शकते. व्यवहार पारदर्शक झाला तर तो शुद्ध होऊ शकतो. तो विचारी माणसांचा आग्रह असू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>