Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

संस्कृतिकारणाचे अध्वर्यू

$
0
0

अरुण जोशी, सुदेश हिंगलासपूरकर

जगभरात होता तसा महाराष्ट्रातलाही १९६० ते १९८० या दोन दशकांतला काळ विविध चळवळींचा होता. बहुसंख्य मध्यमवर्ग कुठल्याना कुठल्या चळवळीत कुठल्यातरी हक्काच्या मागणीसाठी झगडत होता. त्यात या हक्कांसह आणि त्यापलीकडे वाचनाची आस असलेला मोठा समाजगट खेडोपाडी होता. त्याच्यापर्यंत पुस्तके पोहोचवीत यासाठी एक चळवळ १९७४-७५च्या सुमारास उभी राहिली, जी आज 'ग्रंथाली' या नावाने प्रसिद्ध आहे. जाणीवसंपन्न समाजासाठी वाचन आणि विचारांचे व्यासपीठ निर्माण केले त्या 'ग्रंथाली'च्या कार्यात महत्त्वाचे योगदान आहे दिनकर गांगल यांचे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात 'ग्रंथमोहोळ' उठले आणि जिच्या उल्लेखाशिवाय स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही अशी चळवळ रुजली.

पुण्यात 'सकाळ' आणि 'केसरी'मध्ये आपल्या पत्रकारितेचा आरंभ केलेल्या दिनकर गांगल यांनी पुढे शंकर सारडांच्या कल्पकतेतून साकारलेल्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुरवणीला अधिक खुलवले. त्याद्वारे अनेक विषय आणि नवे लेखक घडवले. दुसरीकडे 'ग्रंथाली' वाढत होती. गांगलांचे घर 'ग्रंथाली'मय झाले होते. कुमार केतकर, अरुण साधू, शेखर साठे, विजया चौहान, प्र. ना. परांजपे अशी झपाटलेली माणसे एकत्र येऊन 'ग्रंथाली' नव्या दृष्टीने उभारत होते. यावेळी संस्थापक, सदस्य आणि असंख्य कार्यकर्ते यांचा एकच संपर्कबिंदू होता-दिनकर गांगल! स्त्रीमुक्ती संघटना, शेतकरी संघटना, दलित पँथर, पीडीए अशा विविध संस्थांचे आणि व्यक्तींचे लढे आणि विचार यातील विधायक कामाला 'ग्रंथाली' हे व्यासपीठ निर्माण झाले. महाराष्ट्रात जो साहित्यजागर झाला त्याचे कर्णधारपद गांगल यांनी वाहिले. याचवेळी त्याचे चळवळी पाहणे, वेगवेगळ्या माणसांना भेटणे सुरूच होते. मेळघाट, गडचिरोली, नंदूरबार असे ते फिरत होते, कार्यकर्त्यांशी बोलत होते. यातून पाहिलेले 'रुची'मध्ये समाविष्ट करून समाजात पोहोचवत होते. ग्रंथालीने जी पुस्तके प्रसिद्ध केली त्यांपैकी ऐंशी टक्के पुस्तकांचे लेखक पहिल्यांदा लिहिते झाले होते, त्यामागे गांगल यांना विविध गोष्टींबद्दल असणारे कुतुहल आणि त्या त्या व्यक्तींमध्ये, विषयांमध्ये दिसलेला स्पार्क हाच धागा होता. दया पवार यांचे 'बलुतं' किंवा नरेंद्र जाधवांचे 'आमचा बाप अन् आम्ही' ही त्याची दोन ठळक उदाहरणे. 'ग्रंथाली'च्या माध्यमातून त्यांनी हा ज्ञानयज्ञ सुरू ठेवला. तरी केवळ छापील माध्यम हा त्यांचा आग्रह कधीच नव्हता, किबहुना ज्ञान मिळवण्याचे, सुसंस्कृत होण्याचे तेही एक साधन आहे, असे ते सांगत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी अभिजाततेची ओढ असलेल्या मराठी प्रेक्षकांसाठी फिल्म सोसायटी काढण्याची कल्पना उचलून धरली आणि त्यातूनच वसंत साठे, सुधीर नांदगावकर, जयंत धर्माधिकारी यांच्यासह 'प्रभात चित्र मंडळाची स्थापना' झाली.

संस्कृतिकारण हा विचार त्यांनी 'संवाद'यात्रेच्या काळात मांडला. गेल्या चार दशकांपासून ते त्याचा पाठपुरावा करत आले आहेत. दीपक घारे यांनी यासंबंधी एका ठिकाणी असं लिहिलं आहे, 'गांगल यांच्या आणि ग्रंथालीच्या धोरणांचे संस्कृतिकारण हे एक व्यवच्छेदक लक्षण बनले. वैचारिक भूमिकांचा समन्वय गांगल यांच्या संस्कृतिकरणात अभिप्रेत होता.'

'ग्रंथाली'ची वाटचाल ३५ वर्षांची झाल्यावर त्यांनी 'ग्रंथाली'ची सूत्रे नव्या पिढीकडे दिली, मात्र गांगल थांबले नाहीत. इथे त्यांची नवी इनिंग सुरू झाली, तेव्हा ते सत्तरीत होते. 'संस्कृतिकारण आणि चांगुलपणाचे नेटवर्क' हा त्यांचा ध्यास कायमच राहिला आहे. त्यासाठी त्यांनी वयाच्या सत्तरीत 'थिंक महाराष्ट्र' हे वेब पोर्टल सुरू केलं. आपल्या संस्कृतीतलं चांगलं ते जतन व्हावं, नव्या वाटांचा ध्यास ठेवावा या भूमिकेतून 'थिंक महाराष्ट्र' कार्यरत आहे. लहान- लहा गावांत जे काही चांगलं घडत आहे, जी माणसं स्वार्थाच्या पलिकडे जाऊन आपल्या पातळीवर समाजासाठी काही करत आहे, ज्यांच्याकडे नवी दृष्टी आहे, त्यांना 'थिंक महाराष्ट्र'च्या व्यासपीठाशी जोडून घेण्याची त्यांची आस सतत दिसत राहते.

करोनाच्या काळात आबालवृद्धांच्या हातात मोबाइल आला. त्याचे काही अनिष्ट परिणामही समोर येऊ लागले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म हा चर्चेचा विषय झाला. या पार्श्वभूमीवर 'स्क्रीन इज वर्ल्ड' हा त्यांनी १५ वर्षांपूर्वी मांडलेला विचार आज प्रत्यक्षात आपण अनुभवतो आहोत. वर्तमानकाळाकडे आणि वर्तमानाच्या पलिकडे पाहण्याची आणि सतत कुतुहलानं जगाकडे पाहण्याची दृष्टी त्यांना लाभलेली आहे.

माणसे वाचणे, ती जोडणे, त्यांच्यातून काही ज्ञान जोखणे, त्यांना बोलायला-लिहायला उद्युक्त करणे, त्यासाठी पूर्ण वेळ देणे-दिशा देणे आणि काहीतरी नव्याने सादर करणे हे त्यांचे काम अव्याहत सुरूच आहे. दगडाच्या आत मूर्ती दिसणारा आणि अनावश्यक भाग तासून ती साकारणारा हा शिल्पकार साहित्य-संस्कृतीच्या विश्वात गेली पाच दशके सजगपणे वावरतो आहे. आजही काही सुचले, लिहावेसे वाटले की 'दिनकर गांगल यांचा विचार घ्यावा' असे वाटणारे अनेक आहेत. वयाच्या ८३व्या वर्षी तोच उत्साह आणि उत्तम ते जतन करण्याचा व नवं ते घडवण्याचा त्यांचा प्रयत्न वर्धिष्णू आहे.

देशाचे आर्थिक धोरण १९९० साली बदलले. पुढे तंत्रज्ञानक्रांती घडली आणि त्यानंतरचा काळ वेगळ्याच, नव्या जीवनमूल्यांना घेऊन आला. त्याचा वेध त्यांनी सतत घेतला. यात वर्तमानपत्रं आणि समाजमाध्यमांची जबाबदारी सांगताना मूळ पत्रकार असलेले गांगल म्हणतात, 'आता 'अॅप्रोच' बदलण्याची वेळ आली आहे. कारण समाजाचा रोख बदलला आहे. हे विधान निर्विवाद भासले तरी तसे नाही, त्यावर विचारमंथन बरेच व्हावे लागेल. समाजाला 'इन्फर्मेशन' देताना शहाणपणही शिकवावे लागते. 'एन्टरटेनमेंट'सोबत ती भूमिकाही निभावावी लागते.' त्यामुळेच विवेकी विचार, सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्यापर्यंत पोहोचून त्याचा प्रसार कसा होईल यासाठी ते पायाला भिंगरी लावून फिरत असतात.

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक वाटचालीचा वस्तुनिष्ठ आढावा घेणारे आणि भविष्यवेध सांगणारे, त्याचा पट मांडणारे पुस्तक त्यांनी लिहिले तर तो पुढील काळासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles